पुणे : अवीट गोडीची गाणी, विनोदाचे षटकार, धमाल एकपात्री सादरीकरण अशा विविध टप्प्यांवर उत्तरोत्तर रंगत गेलेली दिवाळी पहाट खऱ्या अर्थाने कळसावर पोहोचली ती कलाकार आणि उपस्थित रसिकांनी घेतलेल्या ‘सिंगल यूज प्लास्टिक’ न वापरण्याच्या शपथेने. ‘संवाद, पुणे’ आणि एस. व्ही. इव्हेंट्स प्रस्तुत ‘रंगारंग धम्माल दिवाळी पहाट’ या कार्यक्रमात शनिवारी (२६ ऑक्टोबर) सांस्कृतिक ठेव्यासोबत सामाजिक भानाची जागरूकताही पाहायला मिळाली.
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर पहाटे रोषणाईने सजले होते. मनमोहक रांगोळीच्या स्वागताने रंगमंदिरात प्रवेश केलेल्या रसिकांनी नंतर आयुष्यातील एक अत्यंत उत्साहाचा, आनंदाचा ठेवा अनुभवला.
प्रसिद्ध निवेदक, अभिनेते संतोष चोरडिया यांनी समाजात वावरताना भेटणाऱ्या व्यक्तींच्या सवयीतून घडणारे विनोद आणि विविध फिल्मी कलाकारांच्या हुबेहूब आवाजासहित केलेल्या नकलांनी रसिकांना हास्यफराळ अनुभवता आला. वंदन नगरकर यांच्या रामनगरीतील किश्श्यांना, ग्रामीण ढंगालाही रसिकांनी दाद दिली. आवाजाचा बादशहा महेंद्र गणपुले यांनी विविध साउंड इफेक्ट्स आणि वेगवेगळ्या लोकांच्या हसण्याच्या पद्धती सादर करून रंगमंदिरात धम्माल उडवून दिली. गायक आकाश सोळंकी आणि गायिका अनुपमा खरे यांनी सादर केलेली भक्तिगीते, लावणी, हिंदी-मराठी गीतांनी सप्तसुरांची उधळण केली. या कार्यक्रमाचे आगळेवेगळे सूत्रसंचालन ‘सावळा’ आणि ‘गंगी’ या पात्रांच्या माध्यमातून संतोष चोरडिया आणि डॉ. कविता घिया यांनी रंगतदारपणे केले. संगीत संयोजन शेखर केदारी यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व कलाकार, तंत्रज्ञ आणि उपस्थित रसिकांनी ‘सिंगल यूज प्लास्टिक वापरणार नाही,’ अशी शपथ घेऊन आपले पुणे स्वच्छ, सुंदर ठेवण्याची, पर्यायाने भारतमातेला स्वच्छ ठेवण्याची प्रतिज्ञा घेतली आणि खऱ्या अर्थाने एका वेगळ्या ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाची अनुभूती सर्वांनीच घेतली.
या प्रसंगी ‘संवाद, पुणे’चे सुनील महाजन, निकिता मोघे, वस्तू-सेवा कर अधिकारी अजित चोरडिया, अरुणाताई गटागट, ज्येष्ठ समाजसेविका सुनीता मदाने आदी मान्यवर उपस्थित होते. पुणेकर रसिकांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला.